Breaking News

मुंबईकरांच्या मनातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईचे स्वप्न आता आपल्याला पुर्ण करायचे आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबईची जबाबदारी पक्षाने बिनीच्या शिलेदारावर दिलीय: देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर

मुंबई:-मुंबई दि. २० ऑगस्ट: जे स्वप्न मुंबईकरांच्या मनातील मुंबईकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें यांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे ही जबाबदारी आपली आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचं स्वप्न धुळीस मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत, ते इतके आत्ममग्न होते, इतके आत्मकेंद्रीत होते की, स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाहीत. या मुंबईकराकडे त्यांनी कधीही बघितले नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचे आहे आणि मुंबईकरांनी जे स्वप्न पाहिले आहे, जे स्वप्न वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले आहे, ते पुर्ण करण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे त्यासाठी कामाला लागा असे आवाहन, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज मुंबई भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार, कँबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले मंगलप्रभात लोढा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. खा. गोपाळ शेट्टी, खा. पूनम महाजन, खा. मनोज कोटक, आ. प्रवीण दरेकर, आ. अमित साटम, आ. पराग अळवणी, आ. तमिल सेल्वन, आ. योगेश सागर, मनिषा चौधरी, माजी मंत्री प्रकाश महेता, राज पुरोहित, कृपाशंकर सिंह, माजी खा. किरिट सोमय्या उपस्थित होते.

आपल्याला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे

मागच्यावेळीच भाजपचा महापौर झाला असता. पण शिवसेनेसाठी आम्ही दोन पावलं मागे आलो, असा गौप्यस्फोटही देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून आले त्यांनी मुंबईला वाऱ्यावर सोडलं. आपल्याला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले..

आशिषजी यांना ट्वेंटी-ट्वेंटी खेळायचे माहित आहे

आशिष तुम्ही क्रिकेट खेळणारे आहात आणि जाणाणारे आहात. त्यामुळे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची तुम्हाला माहीत आहे. हा सामना तुम्ही जिंकणारच असेही श्री. फडणवीस म्हणाले..

रेकॉर्ड ब्रेक स्ट्राईक रेट यावर आमची नजर

एमसीएमध्ये शेलारांनी मुंबई प्रीमीयर लिग सुरू केली आहे. आता पालिकेत मुंबई महापालिका विकास लीग तयार करायची आहे. मध्ये एखादा फुटबॉल आला, अडथळा आला तर त्याला किक कशी मारायची हे तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही दोरी उड्या असोसिएशनचे अध्यक्ष आहात. त्यामुळे कुणी कितीही उड्या मारल्या तरी त्याला किती उड्या मारू द्यायच्या हे तुम्हाला माहीत आहे. मागचा आपला स्ट्राईक रेट मोठा होता. आपण ३५ वरून ८२ जागांवर आलो. आता आपला स्ट्राईक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे याकडे आमची नजर आहे, असंही त्यांनी सांगितलं.

झोपडट्टीवासीयांच्या अडचणी दूर करू

धारावीचे सर्व प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात पूर्ण होतील. धारावीतील लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर देवू.. झोपडट्टीवासीयांच्या अडचणी दूर करू. झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काचे घर मिळेल त्यासाठी आपले सरकार प्रयत्न करेल. पुनर्विकासातील प्रकल्पग्रस्तांना भाडे मिळाले पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करेल. पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करू.. जनतेपर्यंत आपले काम घेऊन जाऊ.

भ्रष्टाचाराचा विळखा सोडवू

आशिष जी हे मराठीची सेवा करणारे व्यक्तिमत्व आहे. मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा मोठा विळखा पडला आहे. आपण भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली आहेत. मुंबईतील सामान्य लोकांचा पैसा काही लोकांच्या तिजोरीत कशाप्रकारे गेला हे आपण पाहिले आहे. हजारो कोटी अर्थसंकल्प असलेल्या मुंबईत दरवर्षी पाणी तुंबलेले आपण पाहतो. दरवर्षी तेच रस्ते आणि तेच खड्डे आपण पाहतो. अनेक शहरांमध्ये काँक्रीटचे रस्ते पूर्ण होऊन तिथे कधीच खड्डे पडत नाहीत. मुंबईत पावसाळा आला की कुलाब्यावरून बोरिवली पर्यंत जायला चार तास लागतात अशी वेस्टर्न हायवेची परिस्थिती आहे. एकेका प्रकल्पाचे काम मुंबई महापालिकेत पंधरा वर्षे चालू आहे. ते प्रकल्प नसून जुन्या लोकांची दुभती गाय आहे. अशाप्रकारे वर्षानुवर्ष हे मलई खात आहेत. कोरोनाच्या काळात प्रेताच्या टाळूवरचे लोणी यांनी खाल्ले.कंपनी तयार करून कोट्यावधी रुपये खावून टाकले. मुंबईच्या सौंदर्यीकरण झाले पाहिजे पण आपल्या लोकांना तीच ती कामे देणे म्हणजे मुंबईतील सामान्य लोकांना धोका देण्यासारखे आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विळख्यातून महानगरपालिकेला बाहेर काढावे लागेल. काही लोकांना मुंबईचे राज्य गेल्याचे दुःख होते. कारण २५ वर्षे या भरोशावर त्यांनी पोट भरले आहे. आता मुंबई मुठभर लोकांच्या हातात राहणार नाही. ती परिवाराची, घराण्याची राहणार नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचेच नाव धुळीस मिळवले आहे. ते इतके आत्मकेंद्रीत होते की स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाहीत. मुंबईकराना कधीही अशा प्रकारचे लोकं मुंबईच्या महापालिकेत निवडून आणायचे नव्हते. मुंबईच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिले आहे ते येत्या काळात पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांना मेहनत घ्यावी लागेल.

डायलॉग तरी चेंज करा

निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र… असा आरोप होईल. त्यांना माहीत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाणार नाही. कारण संविधान आहे. पण मुद्दाम भ्रम तयार केला जात आहे. त्यांनी किमान डायलॉग तरी चेंज करावा, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही

मुंबई मुंबई आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. दिल्ली दिल्ली आहे. देशाची राजधानी आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले तर दिल्लीश्वरांसमोर झुकले. अरे एवढे दिवस काँग्रेसचे मुख्यमंत्री, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तेही दिल्लीत जायचे. जावंच लागतं दिल्लीत. ती राजकीय राजधानी आहे. दिल्ली राजकीय राजधानी असेल तर दिल्लीत जावंच लागेल. त्याशिवाय प्रकल्प कसे पूर्ण होतील? तुम्ही दिल्लीत गेला. पण सोनिया गांधींसमोर नतमस्तक होण्यासाठी गेला. काही झालं तरी चालेल पण मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही. पण मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्री आणि मला जितकी वेळा जावं लागेल तितके वेळा जाऊ आणि मान्यता आणू असेही श्री. फडणवीस म्हणाले.

आ. आशिष शेलार यांच्या भाषणातील मुद्दे

पक्षाने एका विचाराला अध्यक्ष बनवलं आहे

भाजपने मला पुन्हा एकदा मुंबईचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. मी तिसऱ्यांदा अध्यक्ष बनतोय. मी आज कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. पक्षाने आशिष शेलारला अध्यक्ष बनवलं नाही तर एका विचाराला, समस्येला, एका जागृतीला अध्यक्ष बनवल आहे.

मुंबईसाठी काय केलं?

४५ हजार कोटींचा अर्थसंकल्प असताना यांनी काय केलं मुंबईसाठी… ७ राज्याचा अर्थसंकल्प मुंबई पेक्षा कमी आहे. मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा यांचं बजेट मुंबई महापालिकेच्या कमी आहे. पण सुविधा काय दिल्या हा आमचा सवाल आहे. मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईमध्ये ५२ पुल नितीन गडकरी यांनी दिले. मुंबईला सुरक्षित करण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. मुंबईला बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी मोदी सरकारने दिली. कोस्टल रोडची परवानगी आणि मुहूर्तमेढ देवेंद्र फडणवीस सरकारने रोवली. मिठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अर्धा निधी केंद्र सरकारने दिला. ब्रिमस्टोवड प्रकल्पासाठी अर्धे पैसे केंद्र सरकारने दिले. मुंबईतील हॉस्पिटलला निधी राज्य सरकार देते आहे. रेल्वेसाठी निधी नरेंद्र मोदी सरकारने दिला. मुंबईकरांना शिवसेनेने काय दिलं? भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार.

ही लढाई अधर्माच्या विरोधातील आहे

ही लढाई अधर्माच्या विरोधातील आहे. ही लढाई घराणेशाहीच्या विरोधातील आहे. एक परिवार २५ वर्षे चालला. मुंबईकर टाहो फोडत आहे. आम्हाला लोकशाहीचे सरकार हवे आहे. महानगरपालिकेत मुंबईकरांना मुंबईकरांची सत्ता हवी आहे. मुंबईकरांची सत्ता देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात मिळेल. भारत नवभारत होत आहे. थोडसं महाभारत देखील बदलत आहे. कारण कौरव आणि पांडवामधील युद्ध अटळ होते तेव्हा भगवान श्री कृष्ण कर्णाला सांगायला गेले की, तू या युद्धाचा भाग बनू नको, कारण धर्म पांडवांच्या बाजूला आहे भगवान श्रीकृष्णाचे कर्णाने ऐकले नाही. आजचं महाभारत वेगळं आहे. देवेंद्र रुपी कृष्णाने एकनाथर रुपी कर्णाला बाजूला काढले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या लढाईत कृष्णही आणि करणेही आमच्या बाजूने आहे. महापालिकेतील लढाईत भारतीय जनता पक्षाचा महापौर आता कोणीही थांबवू शकत नाही. मुंबईत मुंबईकरांचं राज्य येण्याला कोणीही थांबवू शकत नाही. निवडणुकी पूर्वीच्या काळात कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन आमदार शेलार यांनी केले. शिवसेनेने केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचायचा आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई आपल्याला जिंकायची आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद …

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved