
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सातारा: सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिति व त्यांच्या स्मारकाला विनम्रपणे अभिवादन केले.
महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील शोषित, वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचले. स्त्रियांना परंपरांच्या जोखडातून बाहेर काढत त्यांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच असल्याची भावना याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली.
राज्यात २८०० नवीन बचत गट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करेल असे स्पष्ट केले. राज्यातील ४ कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याला विकासकामांसाठी २ कोटींचा निधी देण्यात आला. अनाथ बालकांसाठी, मिशन वात्सल्य योजना सुरू करण्यात येत आहे. यामागे प्रेरणा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासमयी बोलताना सांगितले.
नायगाव ते मांढरादेवी रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. हा रस्ता लाखो भक्तांसाठी महत्वाचा असल्याने तो नक्की सोडवू, तसेच चौदा गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कॅनलचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल असेही याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
यासमयी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार छगन भुजबळ, मकरंद पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे आय.जी. सुनील फुलारी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सरपंच साधना नेवसे हेदेखील उपस्थित होते.