
उपासमारीची आली वेळ पाच महिन्यांपासून वेतन थकीत
जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जिल्ह्यातील अनेक शाखेत कंत्राटी पद्धतीवर असलेले सुरक्षा रक्षक मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, अजूनपर्यंत त्यांना किमान वेतनानुसार पगार दिल्या जात नाही. मागील पाच महिण्यापूर्वी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष पाऊणकर यांना बँकेत गैरप्रकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्या अध्यक्षांसोबत सुरक्षा रक्षक पुरविनाऱ्या कंत्राटदाराचे साटेलोटे असल्याच्या नावाखाली कंत्राटदारावर कोट्यवधी रुपयांची रिकव्हरी काढून जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकाचे वेतन देणे थांबविण्यात आले. सुरक्षा रक्षकाचे पगार आज होणार, उद्या होणार या आशेवर जिल्ह्यातील अनेक सुरक्षा रक्षक काम करीत आहेत. मात्र, मागील पाच महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कामाचा कोणताही मोबदला देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या पदरात निराशाच पडली आहे.
परिणामी सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबीयांना आता उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान राज्य शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कामगारांचा पगार थांबवता येणार नाही अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, कंत्राटदार व बँकेच्या वादात सुरक्षा रक्षक भरडले जात आहे. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी संबंधिताना वारंवार निवेदने देऊनही वावर तोडगा निघाला नाही. येणाऱ्या दिवाळीच्या आत थकीत वेतन देऊन समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी पीडित सुरक्षारक्षकानी केली आहे.