
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या कामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा शुकवारी/काल मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासोबत आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या अतिविराट सभेला त्यांनी संबोधित केले.
कोकणाला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले असून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणी माणसावर मनापासून प्रेम केलं तसेच कोकणी माणसाने देखील शिवसेनेला भरभरून दिले आहे. कोकणी माणूस साधा भोळा असला तरीही तत्वाचा पक्का आहे, त्यामुळे कोणी त्याच्याशी खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांच्या कपाळी नारळ हाणल्याशिवाय राहत नाही.
काही जण आमच्यावर खोके दिल्याचा आरोप करतात मात्र आम्ही रत्नागिरीच्या विकासासाठी ७५० खोके देणारे सरकार असल्याचे मत याप्रसंगी मोठ्या संख्येने जमलेल्या रत्नागिरीकर नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
राज्यातील युती सरकारने गेल्या सहा महिन्यांत राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विध्यार्थी, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कोकणी माणसाला त्यांच्याच मातीत हक्काचा रोजगार देण्यासाठी बारसू येथे ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प आणणार असल्याचे स्पष्ट करित कोणावरही जबरदस्ती करणार नसून स्थानिकांच्या संमतीनेच हा प्रकल्प राबविण्यात येईल, असेही याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
कोकणातील काजू पिकासाठी काजू बोर्डाची स्थापना केली असून आंबा बोर्ड स्थापन करण्याला देखील तत्वतः मान्यता दिलेली आहे. तसेच कोकणच्या विकासासाठी एमएमआरडीए च्या धर्तीवर कोकण क्षेत्रविकास नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे यासमयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
याप्रसंगी लांजा नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यासमयी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार योगेश कदम, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार सदानंद चव्हाण, किरण सामंत तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.