शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी परिसरात अतिवृष्टीमुळे धान व इतर पिकाचे नुकसान झाले. अवघे धान व इतर पिके पाण्यात बुडाल्याने नापिकीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अतिृष्टीतून काही शेतकऱ्यांचे धान पीक कसेबसे बचावले. बचावलेले धान पीक गर्भावस्थेतून परिपक्व बनल्यानंतर कापणीच्या स्थितीत असताना, अस्मानी संकटामुळे धान पिकावर विविध रोगांचे प्रादुर्भाव उद्भवला. पांढरा पेरवा, खोडकिडा आदीं. किडींच्या प्रादुर्भावामुळे धान व इतर पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. यामुळे ५० ते ६० टक्केपर्यंत धानाला पांढरा लोंब (पांढरा पेरवा) आला आहे. तसेच खोडकिडा या किडींच्या रोगामुळे संपूर्ण धान पीक नेस्तनाबूत झाले आहे, त्यामुळे शेतातील अन्य पिकांवरही या किडींचा प्रादुर्भाव उद्भवला आहे.
परिणामी अतिरिक्त पावसाने झालेल्या नुकसानीत अधिक भर पडली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली असून शेतीचे भयंकर नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून शेतीसाठी घेतलेले सोसायट्यांचे कर्ज फेडायचे कसे, मुलीचे लग्न, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलाचे शिक्षण, शेतमजुरांचे पैसे आदी. यक्ष प्रश्न त्याच्यासमोर आवसून उभे असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नागभीड व चिमुर तालुक्यातील शेतकरी सततच्या अस्मानी व सुलतानी संकटामुळे पूर्णपणे खचला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द, नान्होरी, नांदगाव, पिंपळगाव, सावलगाव, सोंदरी, नवेगाव, कोथूळना, परसोडी, सुरबोडी, बोरगाव, तोरगाव बुज, देऊळगाव, कोलारी, बेलगाव, चौगान, भालेश्वर, झीलबोडी आदी. गावात पांढरा पेरावा व खोडकीडा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव उद्भवला आहे. तरी याबाबत प्रशासनाने सर्वेक्षण करून पिडीत शेतकऱ्यांना किडीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई देण्याची मागणी शिवसेनेचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांच्या नेतृत्वाखाली मान. मुख्यमंत्री, मान. कृषिमंत्री, मान.पालकमंत्री चंद्रपूर, व मान. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना ब्रम्हपुरीचे तहसिलदार उषा चौधरी यांच्या मार्फत निवेदन प्रेषित करण्यात आले.
यावेळी केवळरामजी पारधी सरपंच तथा उपतालुका प्रमुख शिवसेना, श्रीकृष्ण ठाकरे, राकेश चौधरी, जयपाल तुपट, डाकराम ठाकरे, दयाराम गडे, हरिदास गडे, रत्नाकर ठोंबरे, नरेश ढोरे, दुर्योधन आंबोने, किशोर खरकाटे, राजकुमार देशपांडे, जगदीश बनकर उपसरपंच पिंपळगाव, दिलीप साठवे, गोपीनाथ टीकले, अधिकराव तूपट, अतुल देशमुख, संदीप देशमुख, प्रदीप देशमुख, रघुनाथ गडे, सुरेश ठोंबरे, ज्ञानेश्वर गडे आदि. शेतकरी बांधव व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.