तालुक्यातील ३७ हजार ८६८ शिधापत्रीकाधारकांना लाभ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर = राष्ट्रिय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधा पत्रीका धारकांना जानेवारी २०२३ पासुन एक वर्षाच्या कालावधी करीता नियमित मिळणारे धान्य आता मोफत मिळणार आहे. शिधापत्रिका धारकांना फक्त साखरेचे पैसे द्यावे लागणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी,चंद्रपूर यांचे दिनांक ४ जानेवारीच्या पत्रा अन्वये संपुर्ण चंद्रपूर जिल्हयातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचे शिधापत्रिकाधारकांना १ जानेवारी पासुन १ वर्षाच्या कालावधीसाठी रास्तभाव दुकानांतुन नियमित मिळणारे धान्य मोफत दिले जाणार आहे.याचा लाभ चिमूर तालुक्यातील १० हजार ३०७ अंत्योदय शिधापत्रिका व २७ हजार ५६१ प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना पुढील एक वर्षाकरीता होणार आहे.अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड ५ किलो गहु व ३० किलो तांदुळ तर प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचे कार्डावरील प्रतिव्यक्तींना प्रती व्यक्ती १ किलो गहु व ४ किलो तांदुळ मोफत वितरीत करण्यात येत आहे.
तालुक्यातील सदर शिधापत्रीका धारक लाभार्थ्यांना नोहेम्बंर व डिसेंबर मधील थकित नियमित धान्यही जानेवारी महिन्यातही उचल करीत असले तरीही हे धान्य मोफतच मिळणार आहे.धान्य मोफत मिळत असले तरीही अंत्योदय शिधा पत्रीकाधारकांना मिळत असलेले प्रति कार्ड १ किलो साखरेचे २० .०० रुपये दरा प्रमाणे पैसे द्यावे लागणार आहे.ज्या स्वस्त धान्य दुकानदारांनी नोहेम्बर व डिसेंबर महिन्याच्या धान्याची उचल करण्या करीता चालाण भरले आहे त्यांची रक्कम परत करण्यात येणार असल्याची माहिती तालुका निरीक्षण अधिकारी आशीष फुलुके यांनी दिली.