“पाटणसावंगी येथील मानसिक आरोग्य शिबीरात 55 रुग्णांचा सहभाग”
“जनजागृतीसाठी पथनाटय सादर”
नागपूर दि. 09 : प्रसन्न मन हे यशाच गमक आहे. संतानी अंभगाव्दारे मन करारे प्रसन्न असे सांगितले आहे. तरी कोरोनासारख्या महामारीमुळे विविध कारणांमुळे नैराश्याचा सामना करावा लागला आहे. उत्तम मानसिक स्वास्थ ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज केले.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणसावंगी येथे मानसिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्या शिबीरात त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, टाटा ट्रस्ट मुंबईचे व्यवस्थापक किरण पठारे, पाटणसावंगीच्या सरपंच श्रीमती ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिपक सेलोकार, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रिती भिलवार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन उडान जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी अक्षय सरोदे व टाटा ट्रस्टचे कार्यक्रम अधिकारी पियुष खानोलकर उपस्थित होते.
मानसिक आरोग्याचा मुद्दा कोरोनानंतर ऐरणीवर आला आहे. त्यासाठी हा आरोग्य शिबीराचा उपक्रम राबविला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी स्पष्ट केले. अद्यापही मानसिक आरोग्याबाबत बोलायला संकोच असल्याने साध्या मानसिक विकारांचे रूपांतर जुनाट व्याधीमध्ये होते. ते टाळण्यासाठी मानसिक आजाराबाबत जाणिव जागृती झाली पाहीजे. लोकांनीही याबाबत मोकळेपणानं व्यक्त होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उद्या 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस आहे. यानिमित्त जिल्ह्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेगवेगळ्या दिवसाला जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. मुख्य शिबिराचे आयोजन आज पाटणसावंगीला करण्यात आले होते.यावेळी नर्सीगच्या विदयार्थ्यांनी आत्महत्या प्रतिबंधावर पथनाटय सादर केले.या शिबिरात आज दिवसभरात 55 रुग्णांनी सहभाग घेतला. त्यांच्या मानसिक समस्यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला, समुपदेशन व औषधपचार केला.