विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव
शेवगां:-कालच वर्तमानपत्रातील एक अतिशय सुंदर, अंतर्मुख करणारा आणि उद्बोधक लेख वाचनात आला व एका उच्च पदावरून नुकतेच निवृत्त झालेले एक अनुभवी गृहस्थ.. प्रत्येक दिवाळीला लोकांकडून मिळालेल्या कौतुकाने, स्तुतीने, फुले, हार आणि पुष्पगुच्छ यांनी भारावून जात असतात.. घरातील फुलांचा, हारांचा ढीग पाहून अगदी नकोसे व्हावे इतके लोकांचे कौतुक आणि त्याच्यावरील प्रेम दरवर्षी अक्षरशः ओसांडून वाहत असते.. आपली लोकांच्या मनातील एवढी किंमत आणि आदरभाव पाहून स्वतःविषयी अहंकारास्पद भावना झाली नाही तरच नवल.
*निवृत्तीनंतर काही दिवसांतच पुन्हा दिवाळीचा सण येतो, या दिवशी निवृत्त झालेल्या या सद्गृहस्थांना आजही लोक आपल्या पाया पडायला, आशीर्वाद घ्यायला, चर्चा करायला, संवाद साधायला येतील हा विश्वास असतो.. मात्र उत्सवाच्या तीन-चारही दिवसात कुणीही येत नाही. तेव्हा मन थोडेसे कुठेतरी खट्टू होते!*
*निराश मनाला कोणत्यातरी कामात गुंतवावे, म्हणून कुठले तरी पुस्तक काढून हे गृहस्थ वाचण्यास सुरुवात करतात…..कुठल्याशा एका आध्यात्मिक पुस्तकातील कथा त्यांच्या समोर येते….! एका गाढवाच्या पाठीवर देवाच्या काही मूर्ती लादून गाढवाचा मालक त्याला घेऊन जात असतो! भगवंताच्या मूर्ती बघून वाटेत जागोजागी लोक थांबून नमस्कार करतात.खरेतर लोक पाठीवरील देवाला नमस्कार करीत असतात, परंतु गाढवाला वाटते लोक मला नमस्कार करीत आहेत…*
*पाठीवरील मूर्ती योग्य त्या स्थळी सोडल्यावर गाढवाचा मालक आता त्याच्या पाठीवर भाजीचे गाठोडे लादतो आणि जायला निघतो. यावेळी मात्र गाढवाकडे कोणाचेही लक्ष नसते. लोक आपल्याला नमस्कार आता का करत नाहीत? असे वाटून गाढव विचित्र आवाजात ओरडते, लोकांचे लक्ष वेधून घेऊ पाहते परंतु यावेळी सातत्याने ओरडल्यामुळे पाया पडणे तर दूरच पण लोक गाढवाला मारायला सुरुवात करतात व आपले नेमके काय चुकले हे गाढवाच्या लक्षात येत नाही!!! पुस्तकातील वाचलेल्या कथेवरून गृहस्थांना आपल्याला मिळत असलेल्या मान-सन्मानाबद्दलच्या सत्याची उकल होते…!!!*
*.. म्हणूनच नाती जपा, नवी नाती माणूस म्हणून निर्माण करा.. काम झाले की, कोणी विचारत नसते. एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांच्या वास्तवदर्शी लेखावरून एक गोष्ट स्पष्ट होते. लोक पद पाहून जवळ येतात. पण पद गेले की कोणी विचारत नाही.. पण एकदा माणुसकीचे नाते निर्माण केले की, ते शाश्वत असते…!!!*
*ताजा कलम*
*पोकळ मान-सन्मानाच्या मागे लागण्यापेक्षा मला वाटते एक माणूस म्हणून केवळ प्रामाणिकपणे, चांगले वागण्याचा आपण प्रयत्न करू शकतो.. नीतिमत्तेने जगण्यावर, नवनवीन नाती निर्माण करण्यावर आपण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.शेवटी आपल्या संतांनी म्हटलेच आहे, “कोणी वंदा कोणी निंदा ! आम्हा स्वहिताचा धंदा ! *
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*