वडाळा पैकू येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-भारतीय बौद्ध महासभा वडाळा पैकू शाखेच्या वतीने ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन लूंबिनी बुद्धविहार, वडाळा पैकू येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा वडाळा पैकू शाखेचे अध्यक्ष गुलाबराव गणवीर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी विचारवंत प्रभाकर पिसे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश डांगे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक नारायण कांबळे,दयाराम रामटेके उपस्थित होते.दयाराम रामटेके यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.तथागत गौतम बुद्ध,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना माल्यार्पण करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक सुरेश डांगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साऱ्या जगाला हेवा वाटेल असे संविधान भारताला दिले आहे. हे संविधान आता धोक्यात आले आहे. सर्वांगसुंदर असे हे संविधान वाचवायची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याचे संरक्षण करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. ते आपण पार पाळले पाहिजे. संविधानाच्या संरक्षणासोबतच संविधान घराघरात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधानाचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांनी केला पाहिजे.संविधानाचे संरक्षण झाले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले धम्मचक्र गतिमान होत राहील आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण होईल.सध्या शिक्षणापासून बहुजन समाजाला वंचित ठेवण्याचा डाव शासनाचा आहे.तो डाव सर्वांनी एकत्र येऊन हाणून पाडायला हवा.ज्या शिक्षणासाठी महात्मा फुले, सावित्रीमाई फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले आणि शिक्षणाने पुरोगामी महाराष्ट्र घडवला. त्याच पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण संपवून बहुजन समाजाला गुलामगिरीच्या खाईत लोटण्याचे कुटील कारस्थान उलथवून टाकण्याचे आवाहन केले.
प्रमुख मार्गदर्शक प्रभाकर पिसे यांनी वाईट रुठी,परंपरा फेकल्याशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतर ऐतिहासिक आहे.त्यांनी केलेली ही मोठी क्रांती आहे. याच क्रांतीच्या माध्यमातून बौद्ध समाज आज प्रगतीच्या वाटा चालत आहे.या समाजापासून ओबीसी बांधवांनी खूप शिकण्यासारखे आहे.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आपण ताठ मानेने जगत असल्याचे प्रतिपादन केले.अध्यक्षीय भाषण गुलाबराव गणवीर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शिवराम मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक गिरीधर घोनमोडे यांनी केले. आभार भाऊराव साळवे यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.