शाळा,पालक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयाने गावाचा चेहरामोहरा बदलवण्याची ताकद : प्रभाकर पिसे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- शाळा ही गावाचा महत्वाचा घटक आहे.शाळेतून जे शिक्षण दिल्या जाते ते सर्वोत्तम असते. माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे आवश्यक असते ते शाळेतून शिकवल्या जाते. शिक्षक सर्वोत्परी प्रयत्न करुन विद्यार्थ्यांचं जीवन घडवत असतात.सांस्कृतिक महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे. यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.त्यांच्यातील कलेला बहर येतो.शाळा,पालक आणि विद्यार्थी यांचा समन्वय असला म्हणजे गावाचा चेहरामोहरा बदलायला वेळ लागत नाही. व्यसनांपासून युवकांनी दूर राहण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर पिसे यांनी केले. बरडघाट येथील जि. प. प्रा. शाळेत आयोजित वार्षिक शालेय स्नेहसंमेलनात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उदघाटक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून खडसंगी ग्रामपंचायत सरपंच प्रियंका कोलते,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवडू बारेकर,रामचंद्र सहारे,रामभाऊ मेश्राम,हरिभाऊ रिनके, प्रभाकर दोडके,देवराव भोयर,साधना श्रीरामे,मुख्याध्यापक सुरेश डांगे उपस्थित होते.
पाहुण्यांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगेबाबा,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उदघाटक रामदास कामडी यांनी बरडघाट सारख्या लहान गावात शाळा, पालक आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन अभिनंदनीय असल्याचे सांगत गावाच्या पर्यायाने देशाच्या विकासाचे राष्ट्रसंतांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी झटले पाहिजे,असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी केले.संचालन व आभारप्रदर्शन युवा कार्य प्रशिक्षणार्थी हरिकृष्ण कामडी यांनी केले.वार्षिक शालेय स्नेसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळण्याकरिता विविध सांस्कृतिक, बौद्धिक, क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार याप्रसंगी सादर केले. विद्यार्थ्यांसह पालक तथा ग्रामस्थानीही सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धात सहभाग नोंदवला.आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती, गुरुदेव सेवा मंडळ, महिला मंडळ तथा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.