भानुदास पोपटे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-मानव प्राणी दिवसेंदिवस प्रगल्भ होण्यापेक्षा अधोगतीकडेच जास्त जात आहे.अंधार जास्त वाढतोय आणि प्रकाश लुप्त होत आहे अशा वातावरणात दीपस्तंभ म्हणून भूमिका बजावण्यासाठीच लेखक असतात. समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही लेखकावर इथल्या महापुरुषांच्या विचारप्रवाहाने दिलेली असल्याने जोवर समाज संपूर्णपणे प्रगल्भ होत नाही,इथल्या दुरितांचे तिमिर संपूर्णपणे जात नाही तोवर लेखकांना मरण्याचासुद्धा अधिकार ही जबाबदारी देत नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, विधिज्ञ व अभ्यासक ॲड.भूपेश पाटील यांनी चिमूर येथे शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशनाचे समारंभात केले.
चिमूर तालुक्यातील नेरीचे वयोवृद्ध लेखक भानुदास पोपटे यांच्या आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ या दोन खंडात प्रकाशित संदर्भ ग्रंथाचा प्रकाशक सोहळा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान यांचेकडून आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक डॉ.इसादास भडके तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी साहित्यिक ॲड. मनोहर पाटील, पत्रकार जितेंद्र सहारे,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव साहित्यिक सुरेश डांगे, समता सैनिक दलाचे हरी मेश्राम,नितीन वामनराव पाटील हजर होते.
ग्रंथलेखक पोपटे गुरुजी यांना अपघातानंतर चालने आणि बसने सुद्धा मुश्किल झाले आहे अशा परिस्थितीतसुद्धा त्यांनी या संदर्भग्रंथाचे लेखन केले कारण जोवर समाज संपूर्ण प्रगल्भ होत नाही तोवर सातत्याने समाजप्रबोधन करने ही जबाबदारी नियतीनेच लेखकावर सोपवली आहे. त्यामुळे प्रकृतीस्वास्थाचे कारण तर सोडाच मात्र देशातील संपूर्ण अज्ञान जोवर दूर होत नाही तोवर त्यांना मरण्याचा अधिकारही मिळत नाही. महाराष्ट्रातील इतर प्रदेशात ज्या सामाजिक चळवळी आंबेडकरी पर्व सुरु होण्यापूर्वी अस्तित्वात होत्या त्यावर विस्तृत लेखन आढळते मात्र पूर्व विदर्भातील व्यक्तींवर असे संशोधनात्मक लेखन उपलब्ध नव्हते. मात्र या ग्रंथाच्या माध्यमातून आता अनेक विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे संदर्भ उपलब्ध झालेले आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळीचे संदर्भ सातत्याने बदलत असताना इतिहासातील सामान्यजणांच्या कार्यास उजाळा दिला तरच भविष्यातील अनेक आव्हानांना सामोरे जाणे सुलभ होइल अन्यथा हा देश आणि देशातील संविधानिक व्यवस्था ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भूपेश पाटील यांनी दिला.
या अतिशय माहितीपूर्ण ग्रंथाला ॲड. भूपेश पाटील यांची प्रस्तावना आहे. या कार्यक्रमाचे निमित्ताने पहिल्यांदाच चिमूर नगरीत गडचिरोली, नागपूर,चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातील साहित्यिक,अभ्यासक,प्राध्यापक मंडळी बहुसंख्येने हजर होती.या कार्यक्रमात ग्रामसभेचे माध्यमातून पानलोट क्षेत्रात काम करणारे गोंदेडा येथील प्राध्यापक निळकंठ लोनबले यांना सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे यांनी सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन सुरेश डांगे यांनी केले. प्रास्ताविक हरी मेश्राम तर आभारप्रदर्शन प्रकाश कोडापे यांनी केले.
कार्यक्रमाला माजी शिक्षणाधिकारी शिशिर घोनमोडे, पांडुरंग डांगे, सुधाकर खोब्रागडे,केंद्रप्रमुख तुळशीराम महल्ले,नरेश पिल्लेवान आदी उपस्थित होते.