जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/चिमूर:-वाचनाचे व्यासंग जोपासून साधारण व्यक्तीही असामान्य कार्य करून देश प्रगतीपथावर नेऊन ठेऊ शकतो, त्याचे मुर्तिंमंत उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होत. ज्यांनी ज्यांनी वाचनाचा व्यासंग जोपासला त्यांनी त्यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात प्रगती तर केली शिवाय देश आणि समाजसेवेसाठी सुद्धा ते अग्रेसर होते असे अनेक महानायक आणि सामाजिक क्रांती घडविणारे क्रांतिकारी जगाच्या इतिहासात आढळतात.तेव्हा वाचनाचा व्यासंग विद्यार्थी दशेत जर तुम्ही जोपासला तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकता असे मत प्राचार्य डॉ.अमीर धमानी यांनी ग्रामगीता महाविद्यालयांच्या ग्रंथालय विभागाद्वारे आयोजीत वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना व्यक्त केले.
ग्रामगीता महाविद्यालय येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित डॉ. निलेश ठवकर यांनी वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थी हा स्वयंप्रेरीत होत जातो ज्यामुळे तो स्वतःच स्वतःचा मार्गदर्शक बनून आपल्या ज्ञानात भर पाडीत असतो असे मार्गदर्शन केले.तर डॉ.मृणाल वर्हाडे यांनी सुद्धा या वाचन प्रेरणा दिनानिमित्त मार्गदर्शन केले आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे वाचनप्रेम आणि साहित्यलेखन हे कसे विद्यार्थीभिमुख होते यावर सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.संदिप मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.युवराज बोधे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे कर्मचारी मंसाराम घोडमारे, संजय खोब्रागडे, श्रीराम खाडे आणि मुकेश घटे यांचे सहकार्य लाभले.