तातडीची बैठक घेऊन दिले खा.सुनिल मेंढे यांनी सर्वेक्षणाचे निर्देश
जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण
भंडारा:-दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून अहवाल तयार करावा अशा स्पष्ट सूचना खासदार सुनील मेंढे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत दिल्या.सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि अन्य महत्त्वाच्या विषयांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात खासदारांनी बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह अन्य विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. 27 आणि 28 या दोन दिवसात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे शेतातील पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. उभा असलेला आणि कापून ठेवलेला धान तसेच कळपा पावसात भिजल्याने नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.
त्याचे ताबडतोब पंचनामे करावेत आणि शासनाला अहवाल पाठवावा असे निर्देश खासदारांनी यावेळी दिले.रोगाचा प्रादुर्भाव होऊन धान पिकाचे नुकसान झाले होते. त्याचे सर्वेक्षण होऊन जवळपास 10820 हेक्टर मध्ये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी 16 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाने केली असून हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. ही मदत मिळण्याच्या दृष्टीने सकारत्मक प्रयत्न करावेत असे खासदारांनी यावेळी सांगितले. पावसाने झालेले जे नुकसान पिक विमात बसत नसेल तर अन्य पद्धतीने नुकसानग्रस्तांना मिळावे यासाठी नियोजन करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.कारधा ते निलज या मार्गाचे काम 12 ते 13 किलोमीटर एवढे शिल्लक आहे. ते तातडीने पूर्ण करावे अशा सूचना यावेळी खासदारांनी केल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेच्या विषयी आलेली अडचण दूर करण्याच्या दृष्टीने चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले गेले.
नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मिळेल की नाही असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये होता, त्यावरही कार्यकारी अभियंता सोबत चर्चा करून तो दूर करण्यात आला. हेमलकसा प्रकल्पातील झाडे कापण्याचा विषय या बैठकीत चर्चेला आला. या अनुषंगाने प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असून तोही मार्गी लागेल असे सांगण्यात आले.इतरही अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. धान पिकाच्या नुकसानी _संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने हालचाली_ कराव्यात असे निर्देश त्यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना दिले.