*हक़ की, इन्साफ की इस लढ़ाई में अब करेंगे या मरेंगे!
*शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे मनोगत!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: ११ फेब्रुवारी २०२३.. ही तारीख आयुष्यातल्या महत्त्वाच्या तारखांपैकी एक होऊन गेली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी सोयाबीन-कापूस, पिकविमा व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी आत्मदहन आंदोलन केले होते, पोलिसांनी माझ्यासह ५० जणांना अन्यायकारक पद्धतीने अटक केली होती. आजवर कित्येक आंदोलने केली पण हे वेगळे होते, कारण आंदोलन मोडून काढण्याचा जोरदार प्रयत्न झाला होता.
सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या हक्काचा भाव, नुकसानभरपाई, पिकविम्याचा प्रश्न या सगळ्यांची मागणी आम्ही वारंवार करत होतो, त्यासाठी आंदोलनं करत होतो, मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र सरकार असंवेदनशीलपणे बघत राहिले, ही बाब मनाला प्रचंड यातना देत होती. सरकारच्या निर्ढावलेपणाला, निश्चेतन झालेल्या जाणिवांना वास्तवाचा जळजळीत चटका देणे आवश्यक होते. त्यासाठीच की काय मी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला. कदाचित माझ्या मरणाने सरकारचा सुन्न झालेला मेंदू पुन्हा जागा झाला असता. पण छे! सरकारने आपला सरकारी माज दाखवलाच. काही कचखाऊ लोकप्रतिनिधींच्या आदेशावरून पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करून अबालवृद्धांना जखमी केले. माझ्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर मला दवाखान्यात नेणं तर दूरच दोन-तीन तास तळपत्या उन्हात डांबरी रस्त्यावर बसवून ठेवले, अन् काही कारण नसतांना सुरू झाला लाठीचार्ज. आणि उलट माझ्यासह शेकडो सहकार्यांना अटक केली.
दि.६ फेब्रुवारी २०२३ रोजी मी सरकारला दि.११ फेब्रुवारीला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता आणि भूमिगत झालो. पोलिसांनी घराभोवती बंदोबस्त लावला. नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांकडे कसून चौकशी सुरू केली. ११ तारखेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव मला पाठिंबा देण्यासाठी आणि माझ्या काळजीपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमले होते. मी वेषांतर करून पोलिसांचं कोंडाळं फोडत त्या ठिकाणी पोहोचलो आणि मनाने ठरवल्याप्रमाणे अंगावर डिझेल ओतून घेतलं. एका क्षणासाठी डोळ्यांसमोर कुटुंबाचा, मुलांचा चेहरा आला मात्र निर्धार पक्का होता. इतक्यात पोलिसांनी बेसुमार लाठीमार सुरू केला. वयोवृद्धांनाही बेदम मारहाण केली. हा लाठीमार कोणत्या नेत्याच्या इशाऱ्यावरून झाला हे बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला सांगायची गरज नाही.
शेतकऱ्यांसाठी लढत होतो हा गुन्हा ठरवला गेला. आमच्यावर ३०७, ३५३, दंगल, प्रॉपर्टी डॅमेज सारखी अनेक गंभीर कलमं लावण्यात आली. आम्हाला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. नंतर अकोल्याच्या जेलमध्ये पाठवण्यात आले. कुटुंबालाही त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आम्ही ज्या दिवशी तुरुंगात गेलो त्याच दिवशी शेतकर्यांच्या खात्यात पिकविम्याची रक्कम जमा झाली. मागील वर्षी एकूण ५१७ कोटी रु. शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले. हा आमचा विजय होता. राज्यभर या आंदोलनावर प्रतिक्रिया उमटल्या. तुरुंगातून सुटल्यानंतर अकोल्याहून बुलढाण्याला पोहचायला संपूर्ण दिवस गेला कारण ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले, माय-बहिणींनी औक्षण केले.
आज एक वर्षानंतरही या आंदोलनाच्या स्मृती मनात ताज्या आहेत. अंगावरच्या जखमा, वळ, व्रण आता जरा कमी झाले असले तरी मनावरच्या जखमा ताज्या आहेत. आम्हाला शेतकऱ्यांचा मिळणारा भरभक्कम पाठिंबा ज्या राजकारण्यांना सहन होत नाही त्यांनी हे घडवून आणले. गावगाड्यातल्या सामान्य माणसाचं, तरुणाचं प्रेम माझ्यासोबत सतत आहे. आजही आंदोलनाला हजारोंच्या संख्येने शेतकरी पाठिंबा देत आहेत. यंदाही सरकारकडून अजून पर्यंत मदत मिळाली नाही. पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेत आहोत. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मी नको असलेल्यांनी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला वर्षभरासाठी अटक होईल असे षडयंत्र रचण्याचा डाव आखला आहे. पण जनतेची ताकद माझ्यापाठीशी आहे व याच जोरावर मी प्रत्येक लढाई लढण्यासाठी सज्ज आहे.