
वंचित घटकांच्या प्रतिनिधींशी निवडणूक विषयक बैठक
नागपूर दि. 29 : लोकशाहीमध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. लिंग, जात, धर्म, वंश या आधारावर भेदभाव करू नये. तृतीयपंथी व वारांगणा या वंचित घटकांनी निवडणूक प्रक्रीयेत सहभागी होवून मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात निवडणूक विषयक वंचित घटकांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अभिमन्यू बोदवड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख, तहसीलदार, राहूल सारंग, मतदार नोंदणी अधिकारी तसेच वंचित घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.1 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे, त्यांनतर 30 नोव्हेंबरपर्यंत विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमतंर्गत मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन 13, 14, 27 व 28 यादिवशी आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरात तृतीयपंथीयांनी तसेच वारांगणांना स्वयंसेवी संस्थांनी नाव नोंदणीसाठी घेवून यावे. या शिबिरात नाव नोंदणी वगळणे, नावात बदल, स्थळात बदल, प्रभागात बदल, आदी कामे करण्यात येतील. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले
यावेळी मिनल कळसकर यांनी मतदार नोंदणी मोहिमेबाबत माहिती दिली. ऑफ लाईन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे नाव नोंदणी करता येते, असे त्यांनी सांगितले. स्वयंसेवी संस्थांनी वंचित घटकांना सहकार्य करून नाव नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. या घटकांना घोषणापत्राच्या आधारावर नाव नोंदणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नाव नोंदणी नमुन्यात तृतीयपंथीसाठी रकाना दर्शविला आहे, त्यामध्ये बदल करून इतर असे रकान्यात दर्शविण्याची मागणी वंचित घटकांच्या प्रतिनिधींनी केली. त्यावर लेखी अर्ज सादर करा, अर्जावर विचार करून निवडणूक आयोगाकडे मागणी सादर करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.