
नागपुर :- केंद्र सरकारच्या नवीन शेती कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवर गेले अनेक दिवस ठिय्या मांडला असून केंद्र सरकारने अद्याप त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील स्टेडियमना तात्पुरत्या स्वरूपाच्या तुरुंगात रूपांतरित करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच आम आदमी पार्टीचे सर्व स्थानिक आमदार व कार्यकर्त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना जेवणाची सोय केली आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे अद्याप गांभीर्याने घेतले नसल्यामुळे या शेती कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी उद्या ८ डिसेम्बर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदला आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला असून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हा बंद शांतीपूर्णपणे यशस्वी करण्याचे काम करणार आहेत. आम आदमी पार्टी देखील सगळ्या व्यपारी संगठनाना या बंद मध्ये शामिल होण्याचे आव्हान करीत आहे.
“नवीन शेती विधेयक पारित करत असताना देशातील शेतकऱ्यांचे हिताचे असणाऱ्या किमान आधारभूत किमतीच्या हमीला कायदेशीर स्वरूप न देता त्यास वगळून हा काळा कायदा केला गेला आहे. शेतीच्या व्यवहारांमध्ये खाजगी कंपन्यांचा वरचष्मा ठेवणाऱ्या तरतुदी यामद्ये आणल्या गेल्या असून त्याचा विरोध शेतकरी करत आहेत. या ‘भारत बंद’ मध्ये आम आदमी पार्टी सक्रियपणे सहभाग नोंदवेल, तसेच समाजातील इतरही घटकांनी या बंदमध्ये सामील व्हावे असे आवाहन आम्ही करत आहोत.” असे ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी सांगितले.